Sunday, 29 May 2016



"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

डोंबिवलीत आगडोंब..!

..म्हणून जैतापूर प्रकल्प रद्द करा..!

मागील आठवड्यात डोंबिवली मधील “प्रोबोस” नामक केमिकल कंपनीत स्फोट झाल्याने डोंबिवलीत आगडोंब उसळला.कंपनीत स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला.त्यामुळे कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.या स्फोटाच्या भीषणतेमुळे आजूबाजूच्या सहा कंपन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.कंपनीपासून जवळच असलेल्या लोकवस्तीतील घरांच्या आणि दुकानांच्या काचाही या स्फोटामुळे फुटल्या.या स्फोटात शेकडो लोक जखमी झाले असून मृतांचा आकडाही वेगाने वाढत आहे.या स्फोटामुळे लागलेल्या आगीच्या धुरामुळे आजूबाजूच्या लोकांना श्वास घेण्यास त्रास झाला तसेच परिसरातील मोबाईल सेवाही विस्कळीत झाली.

अचानक झालेल्या या स्फोटाचा आवाज जवळपास ५ किमी लांबवर ऐकू गेला.डोंबिवलीत अफवांना उधाण आल्याने धावपळ झाली.या स्फोटामुळे हवेत पसरलेला धूर,केमिकल्सचा जळका वास,त्यामुळे प्रदूषित झालेली हवा आणि हवेतील कार्बन मोनोक्साईडच वाढलेले प्रमाण यामुळे डोंबिवली शहरातील रहिवास्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे योग्य ती काळजी न घेतल्यास डोंबिवली शहराला श्वसनाच्या विकारांचा विळखा बसू शकतो अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.कार्बन मोनोक्साईडच हवेतील परिणाम वाढल्याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होणार असून याचा परिणाम शरीरातील हिमोग्लोबिनवर होण्याची शक्यता आहे.परिणामी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होऊ शकते.हा त्रास वाढल्यास रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवावे लागत असल्याची भिती डॉक्टरांनी बोलून दाखवली.

डोंबिवलीत झालेल्या या स्फोटामुळे एका नवीन प्रश्नाला वाचा फुटली.डोंबिवलीतील औद्योगिक भागात रासायनिक,टेक्स्टाईल,फार्मा,रबर,प्लास्टिक असे जवळपास २५० कारखाने आहेत.या कारखान्यात वेगवेगळे रासायनिक,विषारी,ज्वलनशील पदार्थ व वायू वेळोवेळी हाताळले जातात.तरीही कारखान्यांकडून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती विशेष काळजी घेतली जात नाही.आपत्कालीन परिस्थितीची सूचना देणारे सेन्सर किंवा अलार्म या कंपन्यात नाहीत.तसेच या कंपन्यांच्या कामगारांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याचे ट्रेनिंगही देण्यात आलेले नाही.कारखाने बांधताना व चालवतांना घालून दिलेल्या अटी पाळल्या जात नाहीत.या सर्व गोष्टींमुळे भविष्यात आणखी मोठा अपघात होऊन शहर उध्वस्त होऊ शकते.त्यामुळे परिसरातील लोकांचा जीव धोक्यात आला असून त्यावर काय उपाय करता येईल हा प्रश्न उभा ठाकला आहे.
डोंबिवलीतील या स्फोटातील मृतांची संख्या आता ११ वर जाऊन पोहोचली असून स्फोटाच्या भीषण हादरा बसल्याने सभोवतालच्या तब्बल १५७३ घरांचे प्रत्येकी जवळपास १० ते १२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.त्यानुसार एकूण नुकसानाचा आकडा २ कोटींच्या घरात गेला आहे.तसेच इतर कंपन्यांचे झालेले नुकसान आणि अन्य व्यवसायिकांचे झालेले नुकसान धरून एकूण नुकसानाचा आकडा कोटीच्या कोटी उड्डाणे घेणार आहे.प्रोबेज कंपनीत मदतकार्य सुरु असताना ढिगाऱ्याखाली प्रोपाझील अल्कोहोल या अत्यंत ज्वलनशील आणि थायोलीन क्लोराईड या अत्यंत विषारी अशा केमिकल्सचे प्रचंड साठे आढळले असून या साठ्यांना आगीचा स्पर्श झाला असता तर डोंबिवलीत भोपाल वायू दुर्घटनेसदृश स्थिती निर्माण झाली असती अशी माहितीही समोर आली आहे.

डोंबिवलीत झालेल्या या स्फोटामुळे हाहाकार उडाला आहे.त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या तसेच इतर हानी यामुळे सुरक्षेविषयी अनेक त्रुटी समोर आल्या असून सर्वांची तारांबळ उडाली आहे.आपत्कालीन व्यवस्थेतील त्रुटीही या स्फोटामुळे उघड्यावर पडल्या असून धोक्याची जाणीव झाल्याने सर्वांचे डोळे या स्फोटाने खाडकन उघडले आहेत असेच म्हणावे लागेल.एका केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर कोकणात जैतापूर येथे स्थानिकांचा विरोध झुगारून अणुउर्जा प्रकल्प उभारण्याची तयारी कशाचा बळावर केली जात आहे.याद राखा,अणुउर्जा प्रकल्पाट जर काही असा वेडावाकडा प्रकार झाला तर अक्खा कोकण बेचिराख होईल.अणुभट्टी उभारणे म्हणजे हातभट्टी वाटली की वीटभट्टी? केमिकल कंपनी स्फोटामुळे जर काही अक्कल आली असेल तर त्यातून शिकलेला धडा म्हणून जैतापूर प्रकल्प रद्द करा.



जय महाराष्ट्र..!

Thursday, 26 May 2016




"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

मोदी सरकारची दोन वर्षे..!

उत्तरे तयार ठेवा..!

“अबकी बार मोदी सरकार” आणि “अच्छे दिन आनेवाले हैं” अशा घोषणा देत प्रचंड बहुमताने ऐतिहासिक विजय मिळवत केंद्रात सत्तेत आलेल्या पंतप्रधान मोदींच्या सरकारला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.म्हणजेच मोदी सरकारच्या हातात आता ३ वर्षे उरली आहेत.२ वर्षांचा कालावधी हा सरकारच्या एकूण कालावधीच्या निम्म्याहून थोडा कमी असला तरी मोदी सरकारची दोन वर्षे हिंदुस्थान आणि हिंदुस्थानी जनतेसाठी नेमके काय देणारी ठरली याचा उहापोह होणे निश्चित आहे.सत्ताधाऱ्यांनीही या उहापोहातून योग्य तो निष्कर्ष काढून पुढील ३ वर्षांतील सरकारच्या वाटचालीची दिशा ठरवणे गरजेचे आहे.

मोदी सरकार आल्यामुळे नेमका काय फरक पडला या प्रश्नाचे उत्तर शोधायचे झाल्यास पारदर्शी आणि जलद कामकाजाचा मुद्दा प्राधान्याने विचारात घेतला पाहिजे.मोदी सरकारचा २ वर्षातील कारभार हा अत्यंत पारदर्शी राहिलेला असून अनेक सेवा जलदगतीने उपलब्ध झाल्या आहेत.या दोन वर्षांच्या कार्यकाळात रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी प्रवाशांच्या काही समस्या ट्विटरमार्फत समजताच त्यावर उपाययोजना करून तत्काळ त्या समस्या सोडवल्याचे पाहायला मिळाले असून हे जलदगती कारभाराचे उदाहरण ठरू शकेल.ट्विटरमार्फत कळवलेल्या समस्या जलदगतीने सोडवणे ही गोष्ट कौतुकास्पद आहेच मात्र महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांचा आक्रोश आणि आत्महत्याग्रस्तांचा टाहो ऐकूनही मोदी सरकारने दुष्काळावर एखादा कायमस्वरूपी उपाय म्हणून योजना जाहीर करण्यास आणि ती जलदगतीने पूर्ण करण्यास काय हरकत आहे? महाराष्ट्रात राष्ट्रवादीवाल्यांनी सिंचनाचा राडा केला आहे हे मान्य,मात्र त्या घोटाळेबाजांवर मोदी सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी.पुरावे हवे असल्यास भाजप कार्यालयात बैलगाड्या पाठवून मिळवावेत.

“बहोत हुई महंगाई की मार” असे म्हणत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारलाही महागाईवर फारसे नियंत्रण मिळवता आलेले नाही.महाराष्ट्रात मागील वर्षी ऐन दिवाळीत तूरडाळीचे भाव गगनाला भिडलेले असल्याने सामन्यांची दिवाळी कशीबशी साजरी झाली.खमके नेते म्हणून मोदींना आजही देशभरातून पसंती मिळत असल्याचे अनेक सर्व्हेक्षणांतून समोर येत आहे.अरविंद केजरीवाल,राहून आणि सोनिया गांधी यांच्या तुलनेत मोदींचे नेतृत्व कित्येक पतीने उजवे आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून हिंदुस्थानच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या जास्त अपेक्षा आहेत.मोदी सरकारचा हा २ वर्षांचा कार्यकाळ पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांनीही गाजला.यात मोदींच्या धावत्या पाक भेटीचाही समावेश आहे.मोदींनी परदेश दौऱ्यावर जाण्यास जनतेची हरकत नाही मात्र पाकसारख्या हिरव्या सापाला दुध पाजून समजवण्यापेक्षा मोदींनी “५६ इंच छाती” पुढे करून ठेचून टाकावे अशी माफक अपेक्षा हिंदुस्थानी जनतेने मोदींकडून ठेवायला काय हरकत आहे?

“मेक इन इंडिया” हा मोदी सरकारचा आणखी एक गाजलेला कार्यक्रम.यामुळे देशातील उद्योगाला चालना मिळाली हे खरे,मात्र मोदींनी भारतातील शेतकरी बांधवांच्या शेतमालास योग्य तो भाव मिळवून देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित केल्यास हिंदुस्थान सुजलाम् सुफलाम् होण्यास वेळ लागणार नाही.हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश आहे.हिंदुस्थानात उद्योग आलेच पाहिजेत यासाठी मेक इन इंडिया हा उपक्रम योग्यच आहे,मात्र त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनाही आधार देण्यासाठी मोदींनी योजना सुरु करायला हवी.शेतकरी जगला तरच देश जगेल.त्यामुळे मोदींनी शेतकरी जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी पुढाकार घ्यायलाच हवा.

सरकारच्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडताना सत्तेचा केलेला वापर हा मुद्दाही गृहीत धरायचा असल्यास या बाबतीत काँग्रेस आणि भाजपमध्ये फारसा फरक दिसत नाही.अनेक भाजप नेते आणि मंत्र्यांना सत्तेचा आलेला माज गेल्या २ वर्षात अनेकदा दिसलेला आहे.आपल सरकार आल्याच्या मस्तीत ते आहेत मात्र जोपर्यंत जनतेला सरकार आपलं वाटत नाही तोपर्यंत सर्वकाही व्यर्थ आहे.सरकारच्या कामगिरीचा विषय निघताच आजही भाजप नेते व मंत्री काँग्रेसने ६० वर्षात काय केलय? असा प्रतिप्रश्न करताना दिसतात.हा प्रश्न योग्य असला तरी हे जनतेच्या प्रश्नाचं उत्तर नाही.जनतेने भाजपच्या आणि मोदींच्या हातात मोठ्या विश्वासाने आणि प्रचंड बहुमतासह सत्ता दिली आहे.तेंव्हा त्यांना ५ वर्षांनी जनतेच्या प्रश्नांची उतरे द्यावीच लागतील.ती न दिल्यास जनताच योग्य तो “हिशोब” करेल.मोदी सरकारचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपण्यास अजून ३ वर्षे असली तरी आत्तापासूनच जनतेच्या प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा.


जय महाराष्ट्र..!  

Saturday, 21 May 2016




“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

प्रादेशिक अस्मितेची नांदी..!

“महाराष्ट्राचा सुवर्णदिन”

हिंदुस्थानातील पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला.यात केरळ,आसाम,पश्चिम बंगाल,तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांचा समावेश आहे.या निकालानुसार केरळमध्ये काँग्रेसला पराभूत करत डावे सत्तेवर आले.पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये ममता आणि जयललिता यांचा करिष्मा कायम राहिला.पुद्दुचेरीत काँग्रेस आघाडीला सत्ता मिळाली आणि आसाम मध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले.या निवडणुकांच्या निकालानंतर देशातील राजकारणात घडलेल्या घडामोडी आणि यापुढे घडू शकणाऱ्या संभाव्य घडामोडींच्या शक्यता अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे.या निवडणुकांत प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना नाकी नऊ आणत मिळवलेल्या प्रचंड यशामुळे प्रादेशिक पक्षांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.याखेरीज काँग्रेसने या निवडणुकीत दोन राज्यं गमावत एक छोटे राज्य कमवल्यामुळे ही “काँग्रेसमुक्त भारत”ची नांदी आहे काय? अशा चर्चेलाही उधाण आल आहे.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळवता आला होता.त्यानंतर मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला काँग्रेसमुक्त भारताचा नारा प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली.त्यानंतर महाराष्ट्र,दिल्ली,बिहार,केरळ,आसाम,पश्चिम बंगाल,तामिळनाडू आणि पुद्दुचेरी अशा अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या.यातील निम्म्याहून अधिक राज्यात काँग्रेसला पराभवच पहावा लागला,मात्र याचा अर्थ ती राज्ये भाजपने जिंकली असे नव्हे.भाजपलाही काँग्रेसप्रमाणेच निम्म्याहून जास्त राज्यात पराभवच पाहावा लागलेला आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे एकहाती सत्तेचे स्वप्न उधळून लावल्यानंतर दिल्ली आणि बिहार निवडणुकांत भाजपचा अत्यंत दारूण पराभव झाला आहे.तेंव्हा काँग्रेसच्या पराभवामुळे भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटण्याचे कारण काय? महाराष्ट्रात उधळला गेलेला एकहाती सत्तेचा मनसुबा,दिल्लीत केजारीवालांनी चारलेली धूळ आणि बिहारमध्ये लालू-नितीशसह काँग्रेस आघाडीने दिलेल्या पराभवाच्या डागण्या भाजपवाले इतक्या लवकर विसरले की काय?

महाराष्ट्र,दिल्ली,बिहार,केरळ,आसाम,पश्चिम बंगाल,तामिळनाडू आणि पुद्दुचेरी अशा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले असता जवळपास सर्वच ठिकाणी प्रादेशिक पक्ष भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांना वरचढ ठरले असल्याचे चित्र आहे.महाराष्ट्रात भाजपला १२३ जागांवर मिळालेले यश हे प्रचंड असले तरी ऐनवेळी कृतघ्न भाजपने गद्दारी करून युती तोडल्याने अल्पावधीत प्रचार करून स्वबळावर ६३ जागा जिंकत शिवसेनेने भाजपचे स्वबळावर महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न उधळून लावलेले होते.भाजपला शेवटी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेलाच सोबत घ्यावे लागले.त्यानंतर दिल्लीत केजरीवाल यांच्या “आप”ने ७० पैकी ६७ जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला.बिहारमध्ये लालू-नितीश आणि काँग्रेस यांनी एकत्र येत भाजपला अस्मान दाखवले.केरल,तामिळनाडू,पश्चिम बंगाल,पुद्दुचेरी या राज्यांत भाजपला डोके वर काढण्यात अपयश मिळाले.आसाममध्ये भाजपला पहिल्यांदाच सत्ता मिळाली खरी पण तिथेही त्यांना प्रादेशिक पक्षाची मदत घेऊनच निवडणूक लढावी लागली.या सर्व निकालांचा एकच अर्थ आहे की ही काँग्रेसमुक्त भारताची नांदी नसून प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांपासून मुक्त केलेल्या राज्यांची आणि त्यांच्या प्रादेशिक अस्मितेची नांदी आले.

देशातील अनेक राज्यांत राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष वरचढ ठरले असल्याचे चित्र आहे.यामागील कारण शोधले असता प्रादेशिक पक्षांनी स्वीकारलेला प्रादेशिक अस्मितेचा अजेंडा हेच या यशाचे गमक असल्याचे लक्षात येईल.महाराष्ट्रात शिवसेना एकहाती सत्तेत नसल्याने महाराष्ट्रात मराठी आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो.मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या जनतेने बिहारी,बंगाली आणि तामिळी जनतेचा आदर्श घेऊन शिवसेनेला एकहाती सत्ता द्यावी.तर,तर आणि तरच महाराष्ट्राची मराठी संस्कृती आणि अस्मिता अबाधित राहिल व कोणीही महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करणार नाही.केरळ,तामिळनाडू यांसारख्या राज्यात राज्याची अस्मिता सोडाच पण लुंगी,इडली अशा प्रादेशिक संस्कृतीत महत्वाच्या असलेल्या गोष्टींचाही केलेला अपमान खपवून घेतला जात नाही.महाराष्ट्रात मराठी माणूस आणि मराठी भाषा एवढच नव्हे तर अनेकदा छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याच्या घटनाही घडतात.याचे प्रमुख कारण म्हणजे प्रादेशिक अस्मिता हा प्रमुख अजेंडा असलेला पक्ष सत्तेत नसणे होय.त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने यातून धडा घ्यावा आणि शिवसेनेला एकहाती सत्ता द्यावी.मराठी अस्मितेच्या सन्मानासाठी हे अत्यावश्यक आहे.

महाराष्ट्राचा मराठी बाणा जपायचा असेल तर मराठी जनतेला बिहारी,बंगाली आणि तामिळी जनतेचा आदर्श घ्यावाच लागेल आणि शिवसेनेच्या रूपाने मराठी राज्य आणावेच लागेल.महाराष्ट्रात मराठी अस्मिताच चालायला हवी आणि मराठींनाच प्राधान्य हवे.त्यासाठी मराठी एकजूट दाखवणे गरजेचे आहे.ती ज्यादिवशी दिसेल तो महाराष्ट्राचा सुवर्णदिन असेल.

जय महाराष्ट्र..!



Thursday, 12 May 2016





“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

विरोधकांनो,सावधान..!

भाजपचे पोपट..!

आगामी वर्षाच्या सुरुवातीसच मुंबई,ठाणे,नाशिक,पुणे,नागपूर,सोलापूर या राज्यातील मोठ्या व महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत.त्यातही मुंबई महानगरपालिका निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे.मुंबई महानगरपालिकेवर सध्या शिवसेनेचा भगवा अभिमानानं,स्वाभिमानान डौलान आणि जबरदस्त तेजान फडकतो आहे.शिवसेनेसोबत छोटा भाऊ असलेला भाजपही मुंबई मनपात सत्तेवर आहे.पृथ्वीतलावरील सर्वात मोठा पक्ष ठरण्याईतके “मिसकॉल” जमा असणाऱ्या छोट्या भाजपला आता मुंबई महानगरपालिका स्वबळावर जिंकण्याचे स्वप्न पडत आहे.अर्थात यात नवल काहीच नाही.भाजपची नीतीच ती आहे.त्यामुळेच भाजपने विधानसभा स्वबळावर लढवली (जिंकली नाही बरं का),तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूकही भाजपने स्वबळावर लढवली (ही पण नाही जिंकली) इतकेच नव्हे तर अनेक नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकाही भाजपने स्वबळावर लढवल्या (त्या पण नाही जिंकल्या).एकूणच काय तर पृथ्वीतलावरील सर्वात मोठा पक्ष या बिरुदावलीस शोभेल अशी कामगीरी भाजपला स्वबळावर अजिबात करता आली नाहीये.तरीही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे स्वप्न भाजप पाहत आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीस अद्याप ६ महिने आहेत,मात्र तरीही भाजपचे पोपट आत्तापासूनच पोपटपंची करत आहेत.या पोपटांना स्वतःची अशी अक्कल अजिबात नाही.त्यांना दोन मिरच्या द्या आणि वाट्टेल ते पढवा,हे पोपट मुंबईभर त्याची पोपटपंची करत फिरतात.वृत्तवाहिन्यांचे चर्चाकट्टे ही या पोपटांची आवडती जागा आहे.तिथे जाऊन पोपटपंची करत बसणे हा त्यांचा आवडता कार्यक्रम आहे.जसजशी मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येत जाईल तसतशी या पोपटांची संख्या वाढत जाईल.एवढच नव्हे,एरवी आपल वातानुकूलित ऑफिस सोडून बाहेर न पडणारे नेते आता बाहेर पडतील आणि मुंबईत गल्लोगल्ली फिरायला लागतील.गल्लोगल्ली मुंबई महापालिकेच्या कामकाजावर चर्चासत्रे आयोजित केली जातील.या चर्चासत्रांमधून मुंबई महानगरपालिका कशी भ्रष्ट कारभार करते,मुंबई महापालिका मुंबईच्या दुरवस्थेसाठी कशी जबाबदार आहे हे मांडत असतानाच या सगळ्याला एकटी शिवसेनाच कशी जबाबदार आहे हेदेखील मराठी जनतेच्या मनावर ठसवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल.

मोदी लाटेत बेधुंद आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली भाजप हि रणनीती मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी वापरणार आहे.ज्या शिवसेनेसोबत भाजप सत्तेत आहे त्यांच्याच विरोधात जनतेच्या मनात विष कालवून,शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून मुंबई महानगरपालिकेवर आपलं दुरंगी फडक फडकवण्याचा कुटील डाव भाजपने आखलेला असून आगामी काळात त्यासाठी भाजपचे गलिच्छ राजकारण पाहायला मिळणार आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवणूक स्वबळावर जिंकण्याचे दिवास्वप्न पाहत असलेल्या या भाजपचे नेते २०१२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हातपाय गाळून बसले होते.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि मनसेवाल्यांनी तेंव्हा आरोपांची राळ उडवली होती.मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याची बोंब अख्या मुंबईभर मारण्यात आलेली होती,मात्र तरीही या निवडणुकीत मुंबईकर मराठी जनतेने शिवसेनेलाच विजयी केले होते.याचे श्रेय केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनाच जाते.विरोधकांच्या टिकेमुळे न डगमगता,खोट्या आरोपांमुळे खचून न जाता शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी “करून दाखवलं..!” अस अभिमानानं सांगत शिवसेनेन मुंबईत केलेल्या विकासकामांचा आणि समाजकार्याचा लेखाजोखाच मुंबईकर जनतेसमोर मांडला.जी कामे काही कारणांमुळे राहिलेली होती त्याची जबाबदारी उद्धवसाहेबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली व ती पूर्ण करण्याचे वचन आणि विश्वास जनतेला दिला.रामदास आठवलेंच्या भीमशक्तीला सोबत घेत उद्धवसाहेबांनी शिवशक्ती-भीमशक्ती एकजुटीचा नारा दिला.परिणामी या निवडणुकीत मुंबईकरांनी पुन्हा शिवसेनेवर विश्वास दाखवला.

मागील ५ वर्षातही शिवसेनेने मुंबईत विकासकामे केलेली आहेत.तीच विकासकामे जनतेसमोर ठेऊन “करून दाखवलं..!” असं अभिमानानं सांगत शिवसेना जनतेसमोर जाणार आहे आणि मते मागणार आहे.जे करता येईल तेच बोलू आणि जे बोलू ते करून दाखवू अशी शिवसेनेची भूमिका आहे.ती भूमिका घेऊनच शिवसेना या निवडणुकीच्या रणमैदानात उतरेल.जे येतील त्यांना सोबत घेऊन,नाही येणार त्यांच्या शिवाय आणि आडवे येतील त्यांना गाडून शिवसेना मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकून दाखवेल.त्यापासून शिवसेनेला कोणीही अडवू शकत नाही,अजिबात नाही.तेंव्हा विरोधकांनो,सावधान..! गाठ शिवसेनेच्या वाघाशी आहे.



जय महाराष्ट्र..!

Sunday, 1 May 2016



“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

महाराष्ट्राचा मंगलदिन..!

अब तक छप्पन..!

आज महाराष्ट्र दिन.आपल्या मातृभूमीचा,महाराष्ट्राचा हा मंगलदिन. १ मे १९६० रोजी म्हणजेच आजपासून ५६ वर्षांपूर्वी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.महाराष्ट्राला मुंबई मिळण्यासाठी अनेकांनी लढा दिला,रक्त सांडले आणि बलिदानही दिले.जीवाची बाजी मराठी माणसाने मुंबई मिळवली.२००९ - १० साली संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला.आता संयुक्त महाराष्ट्राची वाटचाल शतकाकडे सुरु आहे.सध्याचा महाराष्ट्र हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र असला तरी बेळगाव,कारवार इत्यादी गावांसह अखंड महाराष्ट्र नाही हि खंत या मंगलदिनी प्रत्येक मराठी मनात आहे.त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राची ७५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी अखंड महाराष्ट्राची स्थापना व्हायलाच हवी अशी शपथ प्रत्येक मराठी माणसाने घेतली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी योगदान द्यायला हवे.

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव खूप वर्षांपासून सुरु आहे,मात्र महाराष्ट्रद्रोह्यांचे हे दिवास्वप्न शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांमुळे अधूर राहिलेलं आहे.महाराष्ट्राला मुंबई मिळालेली नसून महाराष्ट्राने ती मिळवलेली आहे,त्यासाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे.त्यामुळे महाराष्ट्र अखंडच राहील आणि तो राहावा यासाठी तमाम मराठी जनता लढा देईल,प्रसंगी बलिदानही देईल.या लढ्यात शिवसेना आणि शिवसैनिक सदैव अग्रेसर राहून महाराष्ट्रद्रोह्यांना धूळ चारतील आणि महाराष्ट्र अखंड ठेवतील.आजकाल स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा जोर धरू लागलेली आहे.तो कोण चणे,फुटाणे का वाटणे,नाही नाही अणे स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याचे दिवास्वप्न रंगवून मनातल्या मनात मांडे खात आहे.त्याचबरोबर तो संघ परिवारही महाराष्ट्राचे तुकडे करायला टपून बसलेला आहे.महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्यांच्या खांडोळ्या करून महाराष्ट्र अखंडच ठेवण्याचे कार्य करायला महाराष्ट्रप्रेमी मराठी माणूस समर्थ आहे,सज्ज आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं.

काल-परवा त्या अणेने म्हणे स्वतंत्र विदर्भाचा झेंडा बनवला.अहो अणे,या महाराष्ट्राचा झेंडा भगवाच होता,भगवाच आहे आणि भगवाच राहणार.तुम्ही लाख झेंडे बनवाल हो,पण त्यात शिवरायांच्या पवित्र भगव्याचे तेज येणार नाही,कदापि नाही.चार-पाच वेगवेगळ्या रंगांची फडकी जोडली आणि काठीला लावली म्हणजे त्याचा झेंडा होत नाही.झेंड्याला इतिहास असावा लागतो.भगव्याला इतिहास आहे.भगवा हा हिंदू धर्माचा झेंडा आहे.तोच भगवा हाती घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.त्यानंतर तोच भगवा शिवसेनाप्रमुखांनी हाती घेतला आणि तोच भगवा सध्या शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसैनिकांच्या हातात आहे.भगव्याचा हा वारसा शिवसेना समर्थपणे सांभाळत आहे.त्यामुळे महाराष्ट्रात झेंडा फडकणार असेल तर तो भगवाच फडकेल,बाकी कोणतही फडक इथे फडकणार नाही.महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव शिवसेना कदापि यशस्वी होऊ देणार नाही.त्यासाठी शिवसैनिक शेवटच्या श्वासापर्यंत लढा देईल.

आता राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचा.विदर्भवादी लोकांना वाटते भाजपला आपण मतदान केले आहे,ते विदर्भ वेगळा करतील आणि आपला विजय होईल.अहो वेगळा विदर्भ हे भाजपचे निवडणुकीपुढे दिलेले आश्वासन होते.वेगळ्या विदर्भाचे गाजर दाखवून विदर्भवादी लोकांची मते घेऊन भाजप सत्तेवर आहे मात्र ते सरकार आज केवळ शिवसेनेमुळे अस्तित्वात आहे.त्यामुळे भाजप वेगळा विदर्भ करूच शकत नाही,त्यांना ते शक्य नाही.भाजप पृथ्वीतलावरील सर्वात मोठा पक्ष असला तरी महाराष्ट्र आणि शिवसेनेसमोर ठेंगणा आहे.महाराष्ट्रद्रोही वळवळ केल्यास मराठी माणूस भाजपला महाराष्ट्रातून उखडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना चांगलच माहिती आहे.त्यामुळे त्यांच्याकडून वेगळ्या विदर्भाची अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे.त्याऐवजी विदर्भवाद्यांनी केंद्र व राज्यातील भाजप नेते,मंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांना कात्रीत पकडून विदर्भाचा विकास करून घ्यावा आणि महाराष्ट्रीय म्हणून अभिमानाने राहावे.

महाराष्ट्र जिंकू पाहणारे,महाराष्ट्र तोडणारे आणि गिळणारे कित्येक महाराष्ट्रद्रोही आले आणि गेले,महाराष्ट्र मात्र अखंडच आहे आणि अखंडच राहणार.गेल्या ५६ वर्षात महाराष्ट्राने ५६ श्रीहरी अणे पाहिलेत आणि ठेचलेत,यापुढेही महाराष्ट्रद्रोही कितीही अणे निर्माण झाले तरी ते गाडून महाराष्ट्र अभेद्य राहील अखंड राहील.अब तक छप्पन आणि यापुढेही प्रत्येक महाराष्ट्रद्रोही आडवा करून बेळगाव,कारवार इत्यादी गावांसह अखंड महाराष्ट्र निर्मू आणि शिवरायांचा भगवा सदैव फडकवत ठेवू हाच आजचा संकल्प.सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!



जय महाराष्ट्र..!