Saturday, 30 April 2016





“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

रडरागिणी..!

आता सांगा असहिष्णू कोण?

शनिमंदिर,त्र्यंबकेश्वर आणि कोल्हापूर अंबाबाई मंदिर गाभाऱ्यात प्रवेशबंदी आंदोलनाची स्टंटबाजी करून झाल्यानंतर भूमाता महिला ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात असलेल्या महिलांच्या प्रवेशबंदी विरोधात आंदोलन करण्याचा आणि हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला.तृप्ती देसाई यांचा आंदोलनाचा निर्णय जाहीर होतो न होतो तोच इस्लामी नेते,मौलवी आणि संघटनांनी या आंदोलनावर सडकून टीका केली.तसेच हे आंदोलन यशस्वी होऊ देणार नाही,तृप्ती देसाई यांना हाजी अली दर्ग्यात पाउल टाकू देणार नाही असे जाहीर केले.

तृप्ती देसाई यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर करताच अराफत शेख यांनी तृप्ती देसाई यांनी दर्ग्यात प्रवेश करावा मात्र मजारजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ अशी जाहीर धमकी दिली.त्यानंतर समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनी तृप्ती देसाई यांनी दर्ग्यात प्रवेशाचा प्रयत्न केल्यास त्यांना धक्के मारून बाहेर काढू असा इशारा दिला.त्यापाठोपाठ एमआयएमच्या राफत हुसैन यांनी तृप्ती देसाई यांनी मजार प्रवेशासाठी जबरदस्ती केल्यास त्यांना काळ फासू असा इशारा दिला.या सगळ्या धमक्या काय लोकशाहीला धरून होत्या काय? की महिला हक्कांचे संरक्षण करणाऱ्या होत्या? कोणत्याही धमकीला बळी न पडण्याची चिवचिव करणाऱ्यांना या इशाऱ्यांनी गुदगुल्या झाल्या की काय? हिंदू मंदिरातील गाभाऱ्यात सर्व प्रथा,परंपरा,श्रद्धा मोडून,विरोध झुगारून प्रवेश करण्याची अरेरावी करण्याऱ्या तृप्ती देसाई यांनी दर्ग्यात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर करताच त्यांना मुस्लीम नेते आणि मौलवींनी धमक्या दिल्या,मारहाणीची भाषा केली आणि अहो,आश्चर्यम् ! तृप्ती बाईंनी आपली भूमिकाच बदलली,मागे घेतली.हे परिवर्तन कशामुळे? या धमक्यांना भिक न घालण्याचे धाडस तृप्ती देसाई यांना का दाखवता आले नाही?

तृप्ती देसाई या आंदोलनासाठी हाजी अली येथे दाखल झाल्या तेंव्हा त्यांना प्रचंड विरोध झाला.त्यांच्या स्वागतासाठी अबू आझमी,अराफत शेख हे मुस्लीम नेते आपल्या समर्थकांसह हजर होते.अनेक मुस्लीम संघटना,एमआयएम,समाजवादी पार्टी,अवामी विकास पार्टी अशा पक्षांनी साम,दाम,दंड,भेद वापरून कोणत्याही परिस्थितीत तृप्ती देसाई यांना रोखण्याचा निर्णय घेतला होता.तृप्ती देसाई वाहनातून उतरताच उपस्थित जमाव आक्रमक झाला.यात महिलांची संख्याही लक्षणीय होती.त्यामुळे काही वेळासाठी तृप्ती देसाई यांनी तेथून काढता पाय घेतला.तेंव्हाही त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.काही वेळाने त्या पुन्हा दर्गा परिसरात परतल्या.जोरदार घोषणाबाजीमुळे पोलिसांनी देसाई यांना रोखले.त्याच वेळी हाजी अली दर्ग्याचे दार बंद केले गेले.त्यामुळे तृप्ती देसाई यांना दर्ग्यात प्रवेश करता आला नाही.त्यामुळे संतापलेल्या तृप्तीबाईंनी विनाकारण मुख्यमंत्री निवासाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला,मात्र पोलिसांनी त्यांना रोखून आझाद मैदानाकडे वळवले.अशाप्रकारे तृप्ती देसाई यांच्या हाजी अली दर्गा प्रवेशाच्या आंदोलनाचा फज्जा उडाला.

हिंदू देवळांत आंदोलन करताना रणरागिणी असल्याचा आव आणणाऱ्या तृप्ती देसाई दर्गा प्रवेशाच्या वेळी मात्र रडरागिणी झाल्या.हिंदूंना असहिष्णू म्हणणाऱ्यांनी आता आपले तोंड उचकटून आपले मतप्रदर्शन करावे.मुस्लीम नेते आणि मौलवींनी जे केले ते असहिष्णुता दर्शवणारे नव्हते काय? त्यांच्या धर्मातील प्रथांच्या आड येणारी बाब त्यांनी एकजुटीने फोल ठरवली.तत्पूर्वी मंदिर प्रवेश आंदोलनावेळी हिंदू संघटनांनी विरोध केला,मात्र तृप्ती देसाई यांनी आडमुठी भूमिका घेत,अरेरावी करत मंदिरात प्रवेश केला.हे तेथील प्रथा,परंपरा आणि धार्मिक श्रद्धांना हरताळ फासणारे होते.तरीही हिंदू शांतच राहिले.ही हिंदूंची विशाल मनाची भूमिकाच हिंदू धर्माची महती स्पष्ट करते.हिंदू धर्म अतिशय विशाल असून धर्मातील सर्वच प्रथा,परंपरा या विज्ञानाला धरून आहेत.काही अनिष्ट प्रथा या धर्मात नसून गैरसमज आणि अंधश्रद्धेतून सुरु झालेल्या आहेत.त्या बदलल्या गेल्याच पाहिजेत हीच सर्व हिंदूंची भूमिका आहे.अशी विशाल भूमिका घ्यायला फक्त हिंदू धर्मच समर्थ आहे आणि राहील.आता सांगा असहिष्णू कोण?

महिलांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी तृप्ती देसाई यांनी आंदोलन छेडले आहे त्याऐवजी त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी,महिलांच्या हक्कांसाठी,महिलांच्या अत्याचार विरोधात मोठे जनआंदोलन उभारावे.यासारखे मोठे आणि महत्वाचे प्रश्न सोडून मंदिर प्रवेशाचा वाद उगाळत बसण्याला काय अर्थ आहे? हिंदुस्थानातील महिलांसमोर काय तेवढा एकच प्रश्न उरला आहे का? तृप्ती देसाई यांना महिलांसाठी जर खरचं काहीतरी करायची इच्छा असेल तर त्यांनी महिलांच्या मुख्य समस्यांवर आंदोलन करावे.आपोआपच त्या महिलांचा आवाज बनतील,मात्र अशी आंदोलने करत राहिल्या तर त्यांना स्टंट म्हणूनच पाहिले जाईल.

जय महाराष्ट्र..!



Tuesday, 19 April 2016








“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

समाजकार्याचे दुसरे नाव शिवसेना..!

मतांचे सोडा,जनतेचे आशीर्वाद नक्कीच मिळतील..!

गेल्या शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे राबवल्या जात असलेल्या हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेंतर्गत संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या २४४ कन्यांचा विवाह थाटामाटात व धुमधडाक्यात लाऊन देण्यात आला.या दिमाखदार सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम के.विद्यासागर राव,शिवसेनाप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे तसेच इतर शिवसेना नेते आणि शिवसैनिक उपस्थित होते.सामाजिक संकटाची जाणीव ठेऊन आयोजित केल्या गेलेल्या या भव्य विवाहसोहळ्यात जवळपास ५० हजार वऱ्हाडींच्या भोजनाची जंगी व्यवस्था केली गेलेली होती.सोहळ्यासाठी १ लाख तर भोजनासाठी ९० हजार स्क्वेअर फुटांच्या मंडपाची उभारणी केली होती.या सोहळा अविस्मरणीय होण्यासाठी ५००० शिवसैनिकांनी जीवाचे रान केले.

महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ पडलेला आहे.मराठवाड्याचे चित्र हे एखाद्या वाळवंटाप्रमाणे झालेले असून पाण्यासाठी जनतेला हाल-हाल सोसावे लागत आहेत.प्यायला पाणी नाही,शेती तर कधीच जळून गेली,बागा नष्ट झाल्या.ज्यावर पोट अवलंबून होते ते सगळेच दुष्काळाने गिळून टाकले.रोजच्या खर्चाला पैसे नाहीत.अशा परिस्थितीत लेकीचे लग्न कसे करायचे? त्यासाठी लागणारा पैसा कुठून उभा करायचा? अशा एक ना अनेक प्रश्नावर उत्तरच नव्हे तर उपाय घेऊन शिवसेना सध्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावत आहे.दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या कन्यांच्या विवाहाची जबाबदारीच शिवसेनेने आपल्या खांद्यावर घेतली आहे.याचा पहिला टप्पा परभणीत ३३३ जोडप्यांच्या दिमाखदार विवाह सोहळ्याच्या रूपाने पार पडला.नुकत्याच पार पडलेल्या संभाजीनगर येथील दिमाखदार विवाह सोहळ्यात हिंदू,मुस्लीम,बौद्ध अशा विविध धर्माच्या २४४ जोडप्यांचा विवाह त्या-त्या धर्माच्या रिती-रिवाजाप्रमाणे पार पडला.त्यामुळे शिवसेनेतर्फे लावल्या गेलेल्या विवाहांची संख्या ५७७ वर जाऊन पोहोचली आहे.आगामी काळात शिवसेना असे अनेक सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करेल आणि हि संख्या १००० च्या पुढे जाईल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केला आहे.

या विवाह सोहळ्यात सहभागी वधूंना मणी,मंगळसूत्र,जोडावे,पैंजण आणि नथ असा सौभाग्य अलंकारांचा आहेर “मातोश्री”तून दिला जातोय.त्याचप्रमाणे वधूस एक पैठणी,एक हळदीची साडी दिली जात असून वरास एक सफारी सूटही देण्यात येतोय.त्याचप्रमाणे कपात,पलंग,गाडी,घड्याळ,पंखा,कुकर अशा तब्बल ७३ संसारोपयोगी वस्तूंही नवविवाहितांना देण्यात येत आहे.या सोहळ्यातील भोजन व्यवस्था उत्तम असून एकूण सोहळाच शिस्तबद्ध आणि आखीव,रेखीव,योजनाबध्द असा असल्याने हा सोहळा म्हणजे व्यवस्थापन कौशल्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.या सोहळ्यास दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.दुष्काळ पडला-दुष्काळ पडला अशी ओरड करत काय करायचे,कसे करायचे,हे कसे होणार,ते कसे होणार अशी चर्चा करत बसणाऱ्या लोकांसमोर शिवसेनेच्या या विवाह सोहळ्याने उत्तम उदाहरण ठेवले आहे.हा सोहळा म्हणजे शिवसेना गेल्या ५० वर्षांपासून करत असलेल्या समाजकार्याचे पुढचे पाउल आहे.

शिवसेनेची स्थापनाच मुळी सामान्य माणसाच्या न्याय,हक्क व सेवेसाठी झालेली आहे.पुढे जनसेवेसाठीच राजकारणात उतरलेल्या शिवसेनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला ८०% समाजकारण आणि २०% राजकारण हा मंत्र आजही कायम आहे.शिवसेनेतर्फे यंदाच नव्हे तर गेली अनेक वर्षे दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे कार्य अविरत सुरु आहे.दुष्काळग्रस्तांना धान्य,पाणी,आर्थिक मदत तसेच चार छावण्या अशा अनेक स्वरुपात मदत करून शिवसेना दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे आणि त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम करत आहे.अनेकदा राजकीय पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना अशी कामे करताना पहालायला मिळतात.तेच राजकीय पक्ष सत्ता मिळताच जनतेला विसरून जातात.शिवसेना मात्र याला अपवाद ठरली आहे.

दुष्काळग्रस्त बांधवांसाठी अनेक योजना राबवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी बाळासाहेबांचा समाजकार्याचा वारसा जपलेला आहे.शिवसेनेच्या हा निस्वार्थ समाजसेवेच्या व्रताकडे पाहून समाजकार्याचे दुसरे नाव शिवसेना असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.शिवसेना फक्त मतांसाठी समाजकार्याचा दिखावा करून सत्ता मिळवण्यासाठी कार्य करत नाही तर सत्तेत असतानाही जनतेसोबत साहून जनतेच्या व्यथा मांडण्याचे आणि त्यावर शक्य तितक्या उपाययोजना करण्याचे काम शिवसेना करते.मतांचे सोडा,या समाजकार्यामुळे,आणि निस्वार्थ समाजसेवेमुळे शिवसेनेला जनतेचे आशीर्वाद नक्कीच मिळतील आणि जनतेचा आशीर्वाद ज्यांना लाभला आहे त्यांची सत्ता यायला असा कितीसा वेळ लागणार आहे?

जय महाराष्ट्र..!

Friday, 15 April 2016





“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

महिला आणि मंदिरे..!

नाहक नाटके कशाला?

आजकाल देशात आणि महाराष्ट्रात महत्वाचे प्रश्न सोडून नाहक वाद निर्माण करण्यात आणि त्यातून प्रसिद्धी मिळवण्यातच अनेकजण धन्यता मानत आहेत.महाराष्ट्रात सध्या भयंकर दुष्काळ आहे.पाण्याअभावी जीव जाईल अशी स्थिती आहे.अशा परिस्थितीत सामाजिक भान राखून संकटाचा सामना कारण गरजेच आहे,मात्र काही स्वघोषित समाजसुधारक महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या मुद्द्याचे राजकारण करून तृप्त होत आहेत.राज्यात काय स्थिती आहे ते न पाहता अचानक स्त्री-पुरुष समानतेवरुन वादंग निर्माण केला जात आहे.महिलांना मंदिर प्रवेश मिळवून देऊन आपण किती थोर समाजसुधारक आहोत हे दाखवण्याचा खटाटोप सुरू आहे.यात तृप्ती देसाई यांची भूमाता ब्रिगेड संघटना आघाडीवर आहे.

हिंदू धर्मातील काही प्रथा-परंपरानुसार काही मंदिरांत स्त्रियांना प्रवेश नाही.ही गोष्ट खरंतर स्त्रियांनाही मान्य आहे.त्यामागे काही इतिहास आहे,भावना आहेत,भक्तीभाव आहे.कुणावर बंधने लादायची असा उद्देश ठेऊन या परंपरा सुरु झालेल्या नाहीत.या परंपरा का सुरु झाल्या याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.या परंपरांना महिलांचाही विरोध नाहीये.अस असताना या तृप्ती देसाई आणि त्यांच्या संघटनेला महिलांना मंदिर प्रवेशाचा हक्क मिळवून देण्याची लहर आली.ही लहर अचानकपणे येण्याचे कारण काय? इतके दिवस महिलाच नव्हत्या का? कि मंदिरे नव्हती? कि महिलांना मंदिर प्रवेश आज नाकारण्यात आला? काही विचार नाही,अभ्यास नाही,इतर सामाजिक प्रश्नांवर काही भाष्य नाही,उपाय नाहीत,एकच मुद्दा तो महिलांच्या मंदिर प्रवेशाचा उचलला आणि या बाई अंगात आलेल्या बाईप्रमाणे घुमत महाराष्ट्रभर मंदिरभ्रमण करत महिलांना मंदिरप्रवेश देण्यासाठी खटाटोप करत आहेत.अहो,आधी महिलांना संरक्षण नाही त्यावर आंदोलन करा ना.ते जास्त महत्वाच आहे.हे तुम्ही कोणत्याही सुजाण स्त्रीला अथवा कन्येला विचारू शकता.कशाला आजकाल तर एखादी चिमुरडी बालिकाही सांगेल महिला सुरक्षाच महत्वाची आहे,मंदिरप्रवेश नव्हे.

हिंदू धर्मात महिलांना मनाचे स्थान नाही हा शुद्ध गैरसमज आहे.अगदी हिंदू देव-देवतांमध्ये पाहिलं तरी अस लक्षात येईल कि धन,धान्य,विद्या,सुरक्षा या सर्वांचे स्वामित्व हे धनलक्ष्मी,अन्नपूर्णा,सरस्वती,दुर्गा या देवींकडेच आहे,मग अशा हिंदू धर्मात महिलांना स्थान नाही असे कसे म्हणता येईल? महिलांच्या मंदिर प्रवेशाबद्दलच बोलायचे झाले तर काही देवस्थानात महिलांना गाभाऱ्यात प्रवेश नाही हे मान्य,मात्र यावर आंदोलने,दंडेलशाही,कायद्याचा वापर करून बळजबरी हे उपाय नाहीत.यावर सर्वांनी एकत्र येऊन चर्चेने,अभ्यासपूर्वक आणि भावना,श्रद्धा जपून तोडगा काढणे गरजेचे आहे.शिवाय याच महाराष्ट्रात अनेक मंदिरांत महिलांनाच प्राधान्याने प्रवेश मिळतो ही बाबही जाणून घेणे गरजेचे आहे.उदाहरणार्थ सोलापुरात नवरात्रोत्सव काळात रुपाभवानी माता मंदिरात पुरुषांपेक्षा महिलांनाच देवीचे जवळून दर्शन घेता येते.महिला भक्तिभावाने देवीची ओटी भरून आशीर्वाद घेत असतात.त्यामुळे साहजिकच त्यांना प्राधान्य दिले जाते.त्याऐवजी पुरुष भक्तमंडळी महिलांपेक्षा लांबून,देवीच्या पादुकांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात.आता या सध्या सरळ गोष्टीला भेदभाव म्हणायचं काय? यावर सोलापुरातील पुरुषांनी बोंब मारली पाहिजे का? तर अजिबात नाही.त्यामध्ये काही अर्थच नाही.हिंदू धर्मातील प्रथा-परंपरा लक्षात घेऊन अनेक देवस्थानांत असा सुवर्णमध्य काढला गेलेला आहे.यावर ना महिलांची हरकत आहे ना पुरुषांची.अशा ठिकाणी आंदोलनांचा अट्टाहास कशासाठी?

तस पाहिलं तर महिलांनी शनी शिंगणापूर येथील शनी मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश मिळत नसल्याबद्दल कधीही तक्रार केली नव्हती.बहुतांश महिलांना ते मान्य होत,त्यांनी तो नियम स्वीकारला होता.तरीही तृप्ती देसाई यांनी आंदोलन करून महिलांना शनी चौथऱ्यावर प्रवेश मिळवून दिला,मात्र यावर अनेक महिलाही नाराज आहेत.त्यानंतर उत्साहाच्या भरात तृप्ती देसाईंनी विजय मिरवणूक काढून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले,मात्र येथे महिलांना प्रवेशाचा वाद नसल्याने अशा आंदोलनाची गरज नव्हती.शिवाय तृप्ती देसाई यांनी साडी परिधान करून दर्शन घ्यावे असे त्यांना सांगण्यात आले होते,मात्र त्या पंजाबी ड्रेसमध्ये गेल्या.बाहेर येताच चिडलेल्या महिलांनी त्यांना धक्काबुक्की केली,चोप दिला.त्यामुळे आता त्या रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.ज्या महिलांसाठी तृप्ती देसाई झगडत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे त्याच महिलांनी तृप्ती देसाईंना चोप दिला ना? मग महिला आणि मंदिरे हा विषय घेऊन महिला हक्काची नाटके कशाला? त्यातून काय साध्य झाले?

बर या बाई हाजी आली दर्ग्यात सुद्धा महिला प्रवेशाची लढाई लढणार होत्या म्हणे? त्याचे काय झाले? तृप्ती देसाई दर्ग्यात प्रवेश करून दाखवण्याचे धाडस करणार का? की मुस्लीम पर्सनल लॉच्या नावाखाली तो विषय सोडून देणार? आता म्हणे अंनिसवालेही अशाच प्रकारच आंदोलन करणार आहेत.अहो,तुम्हाला तर देव मान्य नाहीये ना? मग देवळात प्रवेश मिळाला काय किंवा नाही मिळाला काय तुम्हाला कसा फरक पडतोय? उगाच कोणीही उठायचं,काहीही करायचं,वरून हिंदूंना असहिष्णू ठरवायचं.तृप्ती देसाई यांनी सर्व नियम झुगारून,श्रद्धा लक्षात न घेता जे केलय ते आम्ही हिंदूंनी सहन केल ना? मग आम्ही असहिष्णू कसे? तृप्ती देसाईंनी हेच आंदोलन एखाद्या मशिदीत किंवा दर्ग्यात प्रवेशासाठी कराव.पाहूयात कोण सहन करत ते.

हिंदू धर्मात स्त्रियांना मानसन्मान आहे.त्यामुळे दुष्काळासारखे गंभीर विषय सोडून किंवा हुंडाबळी,महिला अत्याचार,महिला सुरक्षा असे महिलांचे महत्वाचे प्रश्न सोडून ही असली आंदोलने हवीतच कशाला?

जय महाराष्ट्र..!




Thursday, 7 April 2016



“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

गोंधळात गोंधळ..!

लोकशाही नावाचा बाजार..!

गेले अनेक दिवस हिंदुस्थान आणि महाराष्ट्रात काय चालू आहे हे ब्रह्मदेवालाही समजत नसेल.जेएनयु काय,तो कन्हैय्या काय,तो ओवेसी काय,वंदेमातरम् आणि भारत माता की जय वरून वाद काय? छे,छे..गेल्या ६८ वर्षात देशाची एवढी बेअब्रू कधीच झालेली नव्हती.देशासमोर प्रमुख समस्या काय आहेत?देशाचा विकास कोणत्या गतीने व्हायला हवा आणि तो कोणत्या गतीने व्हायला हवा? प्रचंड बहुमताने निवडून आलेले आणि “पार्टी विथ डिफरन्स”ची पाटी मिरवणाऱ्या पक्षाचे सरकार देशात निवडणून आलेले असताना देशात देशद्रोही किडे कसे काय डोके वर काढू पाहत आहेत? या सगळ्याचा नेमका अर्थ काय? मुळात देशात सरकार आही की नाही? नियम-कायदे आहेत की नाही? असतील तर कोणीही उठून काहीही बोलतो,दहशतवाद्याला शहीद ठरवतो,कोणी उठतो आणि भारत माता की जय बोलणार नाही अशी देशद्रोही भाषा वापरतो.जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र अशी ओळख असलेल्या हिंदुस्थानात सध्या लोकशाही नावाचा बाजार भरलेला आहे.

जेएनयु विद्यापीठात काही विद्यार्थी उठतात.“हमें चाहिए आजादी”च्या घोषणा देतात.कसली आजादी? कसलं स्वातंत्र्य? विरोध केला की अभिव्यक्ती स्वातंत्र्य,लोकशाही अशी कारणे द्यायची.अरे कसली आलीय लोकशाही आणि कसले आलेत कायदे? जी लोकशाही आणि जे कायदे देशाचा मान न राखणाऱ्यांना काहीच करू शकत नाहीत तर त्यांचा उपयोग काय? तो ओवेसी आणि त्याच्या हिरव्या अळ्याही विनाकारण डोके वर काढत आहेत.त्याचं काय तर म्हणे वंदेमातरम् आणि भारत माता की जय बोलणार नाही,मग जा ना पाकिस्तानात.कोणी अडवलंय? जो हिंदुस्थानात राहतो आणि वंदेमातरम्,भारत मत की जय बोलणार नाही असेल म्हणतो त्यांना या हिंदुस्थानात जागा नाही,अजिबात नाही.हे कमी म्हणून यावर कळस लोकशाहीच्या बाजाराचा.विरोध करायचा म्हटल तर म्हणे संविधानात कुठे लिहिलंय ते दाखवा.ज्या देशात राहतो त्या देशाचा जयजयकार करावा हे घटनेत लिहायची काय गरज आहे? घटनेत तस करू नका असं तरी कुठे लिहिलंय? उगाच घटनेचा आधार घ्यायचा.लोकशाहीच्या बाजारात देशद्रोह खपवायचा.आता याचा बाजार उठवायलाच हवा.यांना बाराच्या भावात पाठवा.सरकारला जमणार नसेल तर त्यांनी खुर्च्या सोडाव्यात.बास झाल आता.किती सहन करायचं आणि काय काय सहन करायचं?

विशेष म्हणजे गेल्या ६८ वर्षात जे घडल नव्हत ते आत्ताच का घडायला लागलं काही कळायला मार्ग नाही.या सगळ्याच्या मागे कोण आहे काही कळत नाही.गेली ६८ वर्षे सगळ सुरळीत होत ना? मग आत्ताच “भारत माता की जय बोलणार नाही”च्या उचक्या कशा काय लागल्या? हे सगळ आपोआप घडतंय, योगायोग आहे की घडवलं जातंय काहीच समजत नाही.या सगळ्या घडामोडी हिंदुस्थानला कलंक लावणाऱ्या आहेत.या सगळ्यावर कारवाई करायला कायदे नसतील किंवा सरकारमध्ये हिंमत नसेल तर सरळ खुर्च्यांना लाथ मारा.अरे पण अस कस होईल? खुर्च्याच तर महत्वाच्या नाहीत का त्यांना देशापेक्षा? विसरलोच की,पण एक लक्षात ठेवा,तुम्हाला जमत नसेल तर देशप्रेमी जनतेला कायदे हातात घ्यावे लागतील.त्याला पर्याय नाही.आमच्या हिंदुस्थानचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही.आता लगेच कायदे सक्षम होतील.देशद्रोही लोकांचा विरोध करणाऱ्या देशप्रेमी लोकांना कायद्याचा बडगा दाखवला जाईल.त्यांना पोलीस मारहाण करतील.तुरुंगात डांबले जाईल.आता तुम्ही म्हणाल असे कसे? अहो हाच तर लोकशाही नावाचा बाजार आहे..!

हे झाल हिंदुस्थानच.महाराष्ट्रात जे चालू आहे ते काय “शिवरायांचा महाराष्ट्र” या बिरुदावलीला शोभणारं आहे? कोणीही
उठतो आणि ओरडतो वेगळा विदर्भ.अजून कोणी उठतो वेगळा मराठवाडा.आता ते प्रकाश आंबेडकर.त्यांनी म्हणे वेगळा कोकण अशी कल्पना मांडली.मग कोणी वेगळा पश्चिम महाराष्ट्र मागेल.मुंबईवर तर पूर्वीपासूनच अनेकांचा डोळा आहे.हे वेगळ करा ते वेगळ करा. अहो..थांबा,थांबा. महाराष्ट्राच्या इतक्या फोडी करून महाराष्ट्राचे काय लोणचे घालायचे आहे का? की तुम्हाला वाटले म्हणून तुमच्या तोंडाची गटारे वाहतील? सगळा गोंधळात गोंधळ.या सगळ्याचा फायदा काय? खोट बोलून,खोट आश्वासन देऊन मते मिळवायची.भाजपने काय केल? त्यांना माहिती आहे,वेगळा विदर्भ सात जन्मात शक्य नाही.अहो पण आश्वासन देऊन मत मिळवायला काय जातय? मत मिळाली की सत्ता मिळते.सत्ता म्हणजे खुर्च्या.झाल की हो.सगळ फिरून फिरून कुठे आलं? सत्तेच्या खुर्चीकडेच ना.तिथेच येणार.देश आणि राज्य नाही फक्त सत्तेच्या खुर्च्या महत्वाच्या आहेत सगळ्यांना.आपणच वेडे आहोत.देशप्रेम आणि महाराष्ट्रप्रेम आपल्यालाच सुचत.कारण ते वेड आपल्या रक्तात आहे.आपल्यावर महाराष्ट्रातल्या मराठी मातीचे संस्कार आहेत आणि हिंदुस्थानाच्या हिंदवी बाण्याचे आपण पाईक आहोत.जे हेच विसरलेत त्यांच काय घेऊन बसलात? अपेक्षा तरी कोणाकडून आणि का ठेवायच्या?

चला.किती आणि काय लिहिणार.सगळाच गोंधळात गोंधळ आहे.ज्या मोदी सरकारला प्रचंड अपेक्षा ठेऊन प्रचंड बहुमताने निवडून दिल त्यांच्याच काळात हे सगळ व्हावं? वाटल नव्हत अस होईल म्हणून असो.अजून ३ वर्ष बाकी आहेत त्यांची.पाहूयात.अपेक्षा नाही,पण आशा ठेउयात.आशा वेडी असते अस म्हणतात.इथे उरलेली ३ वर्षे फुकट गेली तर आशा नाही आपण वेडे आहोत असही वाटेल कदाचित.आपण जर चूक केलीच असेल तर आता शिक्षाही मिळेलच.काय माहिती काय होणार आहे आणि काय नाही? सध्या सगळेच बाकीचे विषय पेटलेले आहेत,आणि दुष्काळासारखा महत्वाचा विषय बाजूला पडलेला आहे.जनतेच्या प्रश्नांचं कोणाला काय पडलंय?



जय महाराष्ट्र..!

Friday, 1 April 2016




“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

देवनारच्या आगीचा धूर..!

भाजपचे गुढग्याला बाशिंग..!

गेल्या काही दिवसात मुंबई डंपिंग ग्राउंडला आग आग लागण्याच्या घटना घडत आहेत.देवनारच्या या आगीतून पडणाऱ्या धुरामुळे पर्यावरण आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.अशा परिस्थितीत या आगीची कारणे आणि त्यावरील उपाययोजना शोधण्याऐवजी भाजप नेते या आगीसाठी शिवसेनेला जबाबदार ठरवण्यात दंगले आहेत.राजकीय फायद्यासाठी सोडला जाणारा हा देवनारच्या आगीचा धूर म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे गुढग्याला बांधलेले बाशिंग आहे.राष्ट्र जिंकले,राज्य जिंकले,आता मुंबई जिंकू अशी असे मनसुबे असलेल्या भाजपने देवनारच्या आगीचे अत्यंत घाणेरडे आणि गलिच्छ राजकारण चालवलेले आहे.

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी देवनार डंपिंग ग्राउंडला लागलेली आग शिवसेनेनेच लावली असा बिनबुडाचा आरोप केला.ही आग शिवसेनेने लावली हे सोमय्यांना कसे समजले? शिवसेना आग लावत असताना ते काय देवनारच्या कचऱ्याच्या ढिगाआड लपून बसलेले होते काय? की देवनारच्या दुर्गंधी हवेत पर्यटनास आलेले होते? सोमय्यांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे देऊन भुजबळांच्या विरोधात जशी कायदेशीर तक्रार ते शिवसेनेविरोधात करणार आहेत का? त्यांच्याकडे या गोष्टीचे पुरावे असतील तर नेहेमीप्रमाणे त्यांनी पुरावे देत तक्रार का केली नाही,आणि संध्याकाळी वृत्तवाहिनीवरील चर्चेत त्या पुराव्यांचे कागद का झळकावले नाहीत? या सगळ्या प्रश्नांना सोमय्यांकडे उत्तर नसेलच कारण त्यांनी हे आरोप करताना पुराव्यापेक्षा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवली.शिवसेनेवर असे आरोप व्हायला लागले की मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ आली हे पाळण्यातील बाळही सांगेल.

सोमाय्यांच्या साथीला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारही भुंकायला लागले.नगरसेवक व्हायची लायकी नसलेले शेलार मोदी लाटेत आमदार झाले आणि आता ते शिवसेनेविरोधात भुंकायला प्रसिध्द झाले आहेत.मागील वर्षी पावसाळ्यात त्यांनी शिवसेनेवर नालेसफाईत घोटाळा केल्याचा आरोप केला.त्याचे काय झाले? आरोप सिध्द व्हायचं तर सोडाच,त्या आरोपातून शिवसेनेला “क्लीन चीट” मिळाली.मुंबईत अतिवृष्टी झाली की समुद्राला भरती आलेल्या काळात समुद्राचे पाणी शहरात घुसते.जमिनीची उंची ही समुद्रसपाटीपासून कमी असल्याने आणि जमिनीचा भाग सखोल असल्याने ते पाणी जमिनीवर साचते.वरून सतत पडणाऱ्या पावसाचे पाणीही वाहत जाऊन सखोल भागात साचते हे सांगायला कुणा तज्ञाची गरज नाही.सामान्य बुद्धीमत्ता असलेली व्यक्ती हे सहज सांगू शकते.इतकी वर्ष शिवसेनेच्या कृपेमुळे मुंबईत सत्तेवर असलेल्या भाजपला आता स्वबळावर मुंबई जिंकण्याचे दिवास्वप्न पडलेले असून त्यात ते पूर्ण आंधळे झालेले आहेत.त्यामुळे आता एकट्या शिवसेनेवर आरोप करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायची आणि मते मिळवायची असा भाजपवाल्यांचा डाव आहे.

शिवसेनेने देवनार आग प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करत भाजपच्या फुग्यातील हवाच काढून घेतलेली आहे.देवनार डंपिंग ग्राउंडचा प्रश्न तीन महिन्यात सोडावा असे शिवसेना पक्षप्रमुखांनी भाजपला ठणकावले आहे.केंद्र,राज्य आणि महापालिकेत भाजप शिवसेनेसोबत आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक सुद्धा राज्य सरकार म्हणजेच भाजपनेच केली आहे.अशा परिस्थितीत भाजपने देवनार डंपिंग ग्राउंडचा प्रश्न ३ महिन्यात सोडवावा असे रोखठोक मत शिवसेना पक्षप्रमुखांनी मांडले आहे.देवनार डंपिंग ग्राउंडचा प्रश्न अत्यंत जटील होत चालला असून देवनारच्या कचऱ्याच्या आगीवर राजकीय पोळ्या भाजण्याचे घाणेरडे राजकारण केले जात आहे,मात्र हे राजकारण करण्यापेक्षा लोकांना होणाऱ्या त्रासावर आधी इलाज करायला हवी अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांनी मांडली आहे.शिवसेनेने आजवर जनतेचे प्रश्न सोडवायचे बाजूला ठेऊन त्याचे घाणेरडे राजकारण केलेले नाही आणि आम्ही ते करणारही नाही.

भाजपला महापालिका निवडणुकीपुढे मुंबईकरांचा पुळका आला आहे.त्यामुळे आंधळे झालेले भाजप नेते आज खाल्ल्या घराचे वासे मोजताना दिसत आहेत.आज देवनार आगीला त्यांनी शिवसेनेला जबाबदार ठरवलेले आहे.अजून दोनच महिन्यात पावसाळा येईल.पुन्हा नालेसफाईचे मढे उकरून त्याची राख मुंबईकरांच्या डोळ्यात फेकली जाईल.मुंबई पालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कदाचित समुद्राला येणाऱ्या-भरती ओहोटी,मुंबईत दिवसेंदिवस कोसळणाऱ्या पावसालाही शिवसेनेलाच जबाबदार ठरवू शकते.शिवसेना जर भ्रष्टाचार करते तर मग भाजप मुंबईचे उपमहापौरपद सोडून सत्तेतून बाहेर का पडत नाही? राज्यात त्याच शिवसेनेचा पाठींबा भाजपला कसा लागतो? केंद्रात तीच शिवसेना सोबत कशी चालते? एकीकडे शिवसेनेच्या कृपाशीर्वादाने सत्ता मिळवायची आणि दुसरीकडे स्वार्थासाठी शिवसेनेवर बिनबुडाचे घाणेरडे आरोप करायचे असे भाजपचे धोरण आहे.“कामापुरता मामा” या म्हणीप्रमाणे भाजप वागत असून ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे.तुमचे असले घाणेरडे खेळ न ओळखता तुमच्या धूळफेकीस बळी पडायला आणि कावळ्याच्या हाती मुंबईचा दरबार द्यायला जनता वेडी नाही हो.पहायचच असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालादिवशी पहा.भगव्याच्या तेजात होरपळून तुमची राख होईल.

जय महाराष्ट्र..!