Saturday, 15 October 2016



“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

ठाकरी तोफ धडाडली..!

देशद्रोह्यांचे सडके मेंदू..!

मागील आठवड्यात शिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी दसरा मेळावा मोठ्या दिमाखात,जल्लोषात आणि तुफान जनसागराच्या साक्षीने पार पडला.शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरेंच्या विचारांचं सोनं लुटायला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतीर्थावर जमले होते.शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्या मार्गदर्शनात हिंदुस्थान आणि महाराष्ट्रातील सध्याच्या सर्वच मुद्यांना स्पर्श केला आणि प्रश्नांना वाचा फोडली.दहशतवादाच्या गंभीर प्रश्नावर बोलताना शिवसेनेची ही ठाकरी तोफ धडाडली.दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुखांनी पाकड्यांची आणि हिंदुस्थानात राहून पाकड्यांचे गुणगान गाणाऱ्या देशद्रोह्यांची सालटी काढली.त्याचबरोबर हिंदुस्थानी सैन्याच्या “सर्जिकल स्ट्राईक”चे पुरावे मागणाऱ्या महामुर्खांचाही त्यांनी ठाकरी शैलीत समाचार घेत पिसं काढली.

शिवसेना पक्षप्रमुखांनी दसरा मेळाव्यातील भाषणात “पिओके” मध्ये घुसून पाकड्यांना धडा शिकवणाऱ्या हिंदुस्थानी सैन्याचे आणि पंतप्रधान मोदींचे जाहीर कौतुक केले.आत्तापर्यंत आपण नुसते निषेधाचे खलिते पाठवत होतो पण यावेळी पाकला हिंदुस्थानी जवानांनी मर्दासारखे उत्तर दिले.आम्हाला असेच नरेंद्रभाई पाहिजे आहेत,पण केवळ एका “सर्जिकल स्ट्राईक” वर थांबू नका,पिओकेच नव्हे तर पाकिस्तान पण हिंदुस्थान म्हणूनच ओळखला गेला पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.त्याचबरोबर “खेळ,कला आणि राजकारण एक करू नका” असा सल्ला शिवसेनेला देणाऱ्यांवर शिवसेना पक्षप्रमुखांनी ठाकरी भाषेत आसूड ओढले.पाकमध्ये आपल्या कलाकारांना बंदी घातली जाते आणि इकडे गुलाम अली,कसुरीचा कार्यक्रम शिवसैनिकांनी उधळला की राज्य सरकार त्यांना कडेकोट बंदोबस्त पुरवते हा विरोधाभास दाखवून देत शिवसेनेला मानवतावाद शिकवण्यापेक्षा पाकड्यांना मानवतावाद शिकवा असे ते म्हणाले.

हिंदुस्थानी सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईवर शंका घेत त्याचे पुरावे मागणाऱ्या संजय निरुपम,अरविंद केजरीवाल आणि इतर नेत्यांवर तसेच अभिनेत्यांवर शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्या भाषणात सडकून टीका केली.सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांच्या धमन्यात भारतमातेच रक्त नव्हे तर लाहोर आणि इस्लामाबादच्या गटारांच पाणी वाहत आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुखांनी मोदीविरोध करण्याच्या नादात देशद्रोही फुत्कार काढणाऱ्यांना सोलून काढले.राहुल गांधींच्या “रक्ताची दलाली” या वक्तव्याचाही शिवसेना पक्षप्रमुखांनी समाचार घेतला.राहुल गांधींनी हा शब्द बोफोर्समधून शिकला असावा असं म्हणत अशा सडक्या मेंदूंची माणंस आपल्याकडे आहेत त्याचाच हा पुरावा आहे असे ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेबांनी आपल्या भाषणात बोलताना रेसकोर्सवर उद्यान उभं करण्याच्या आपल्या मागणीची आठवण करून दिली,पण आता त्यावर “वॉर म्युझियम” उभं केल जावं असे ते म्हणाले.या वॉर म्युझियममध्ये आपले सैनिक नेमक्या कोणत्या परिस्थितीत लढतात,तिथे वातावरण कस असतं,उपाशीपोटी दिवस कसे काढावे लागतात,युद्धात वापरले जाणारे रणगाडे,शस्त्रास्त्रे यांच भव्य प्रदर्शन भरवाव अशी कल्पना सुचवली.त्याचबरोबर या वॉर म्युझियममध्ये एका खोलीत सीमेवरील परिस्थिती आणि वातावरण निर्माण करावे आणि ज्यांना पाकचा पुळका येईल त्यांना त्या खोलीत पाठवून ते अनुभवायला लावावे जेणेकरून आपल्या सैन्यावर शंका घेण काय असतं ते त्यांना कळेल अशी मागणी त्यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुखांनी सुचवलेला हा जालीम उपाय आणि त्यांच्या भाषणाद्वारे मांडलेले मुद्दे खरोखरच विचार करण्यासारखे आहेत.आजकाल आपल्या देशात अशा सडक्या विचारांच्या लोकांचे प्रमाण वाढत आहे.ज्यांनी दिवाळीतील टिकल्यांची बंदूकही हातात धरून उडवलेली नसेल,सुतळीबॉम्बसुद्धा उडवले नसतील असे लोक आज आपल्या सैन्यावर शंका घेतात.त्यांच्या कामगिरीचे कौतुक सोडा,त्याचे पुरावे मागतात? हे देशद्रोह्यांचे सडके मेंदू चेचून ठेचून टाकायला हवेत.अशा विषारी विचारांचा प्रचार-प्रसार थांबवायला हवा.खरच रेसकोर्सवर सरकारने “वॉर म्युझियम” बनवावं आणि अशा कुजक्या मनोवृत्तीच्या लोकांना तिथे सैन्य ज्या स्थितीत आहे त्या स्थितीचा अनुभव घ्यायला पाठवावं.सैन्यावर आरोप करणारे जिवंत परत येणारच नाहीत.

देशाच्या सैन्यावर,त्यांच्या सामर्थ्यावर शंका घेण हा देशद्रोहच मानायला हवा.अशा सडक्या मेंदूच्या लोकांना फाशीचीच शिक्षा हवी.मागे एकदा वर्तमानपत्रात बातमी वाचली की कोणत्यातरी एका देशात संरक्षण खात्याची बैठक सुरु असताना सैन्याप्रमुखाला झोप अनावर झाली म्हणून तिथल्या राज्यकर्त्याने त्याला थेट तोफेच्या तोंडी दिल.का तर संरक्षणासारख्या गंभीर विषयात अशी चूक किंवा बेजबाबदार वर्तन खपवून घेण त्यांना मान्य नव्हत.हे करण योग्य की अयोग्य तो भाग वेगळा,पण देशद्रोह करणाऱ्यांना तरी अशी कठोर शिक्षा केली जायलाच हवी तरच हे माजलेले गेंडे भानावर येतील.

जय महाराष्ट्र..!


No comments:

Post a Comment