Saturday, 24 September 2016



"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

उरी बसलेला घाव..!

बदला घ्या..!

हिंदुस्थानात सध्या पाकड्यांनी "उरी" येथे केलेल्या हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.पाकड्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात हिंदुस्थानचे तब्ब्ल १८ जावं धारातीर्थी पडले.देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या या शूरांना या भ्याड हल्ल्यात वीरमरण आले.पाकड्या दहशतवाद्यांचा हा भ्याड हल्ला हिंदुस्थांच्या उरी बसलेला घाव आहे.या हल्ल्यानंतर हिंदुस्थानात पाकचा तीव्र निषेध करण्यात आला.वेगवेगळ्या मार्गांनी पाकविरुद्धचा संताप व्यक्त केला गेला.कुठे घोषणाबाजी केली गेली तर कुठे पाकचे झेंडे जाळून निषेध केला गेला.देशभरातील प्रत्येक मनात एकच भावना पसरली.ती म्हणजे बदला घ्या..! "लातों के भूत बातों से नहीं मानते" या म्हणीप्रमाणे पाकचे वर्तन आहे.तेंव्हा वाट कसली पाहायची? लाथा घाला.१८ जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका.त्यांना अभिमान वाटेल अशी श्रद्धांजली वाहा.

पाकचे हे नापाक हल्ले आता काही नवीन नाहीत.त्यानंतर बेशर्मपणे हात झटकणं किंवा हल्ल्याचं खापर हिंदुस्थानवरच फोडण हेही नवीन नाही.तसेच "हिंदुस्थान हाच खरा दहशतवादी देश आहे" असं पाकड्या पंतप्रधानांनी जगभर बोंबलत फिरणंही नवीन नाही.इतके दिवस पाकला इशारे दिले.समज दिली.क्रिकेट डिप्लोमसी केली.सगळं केलं.तरी परिणाम शून्य.एकवेळ पालथ्या घड्यात पाणी भरेल आणि कुत्र्याचं शेपूटही सरळ होईल,पण पाक काही दहशतवादाला खतपाणी घालणं सोडणार नाही.सुधारण्याची इच्छा असेल तर वाल्याचा वाल्मिकीही होऊ शकतो,पण पाकला कधीच आपल्या नापाक कृत्यांचा खेड नाही,खंत नाही,पश्चाताप नाही.ढीगभर पुरावे दिले तरीही कारवाईचं सोंग करायचं आणि पुन्हा दहशतवादी हल्ला घडवायचा.पुन्हा आपले जवान नाहक मारले जाणार.पुन्हा आपण इशारा देणार.पुन्हा मेणबत्या लावणार.श्रद्धांजली वाहणार.हे असं किती दिवस चालवून घ्यायचं? हिंदुस्थानचा अपमान का आणि किती दिवस सहन करत राहायचा?


उरी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.कोणी म्हणाल पाकसोबत आता चर्चा नको,कृती करा.कोणी म्हणाल पाकला देण्यात येणार पाणी अडवा.प्रत्येकांनी संताप व्यक्त केला.आता प्रत्येकजण कारवाईची वाट पाहतो आहे.हिंदुस्थानचे "५६ इंच छाती फेम" पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिंदुस्थानी जनतेला प्रचंड अपेक्षा आहेत.मागील लोकसभा निवडणुकीत मोदींनी दहशतवादाच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती."दहशतवादाचा मुकाबला करायला ५६ इंच छाती लागते" अशा आशयाचं वक्तव्य करत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता आणि जनतेच्या टाळ्या घेतल्या होत्या.एवढाच नव्हे तर लोकांची मने जिंकत मतंही मिळवली.त्याच बळावर त्यांचे सरकार प्रचंड बहुमतासह सत्तेत आहे.मोदींच्या त्या आवेशपूर्ण भाषणामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला होता.मोदी पंतप्रधान झाल्यास पाकशी युद्ध करतील अशी आशा नसली तरी पाकला धडा शिकवतील,जशास तसे उत्तर देतील अशी अपेक्षा होती,आजही आहे. या गोष्टीचा विचार मोदी कधी करणार आहेत? अजूनही वेळ गेलेली नाही.मोदी सरकारचा अजून निम्मा कार्यकाळ शिल्लक आहे.त्यांनी याचा विचार जरूर करावा आणि कृतीही करावी.यात मोदी असमर्थ ठरल्यास निदान पाकड्या दहशतवादाच्या बाबतीत तरी त्यांच्यात आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये अजिबात फरक राहणार नाही.हे म्हणजे जनतेची फसवणूक करणे होय.जनतेचा विश्वासघात करण्याचे पाप निदान मोदींनी तरी करू नये.
शिवसेनेच्या भूमिकेबद्दल विचार करायचा झाल्यास पाकला जशास तसे,सडेतोड उत्तर देऊन पाकच्या भ्याड हल्ल्याचा बदल मोदींनी घ्यावा हीच शिवसेनेची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे.त्याचबरोबर पाकड्या कलाकारांना,खेळाडूंना आम्ही महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात पाय ठेऊ देणार नाही हि आमची भूमिका कायम आहे.आता म्हणे झी समूहाच्या कोणत्या तरी एका वाहिनीने पाक कलाकारांचे शो,सीरिअल्स बंद करण्याचा निर्णय घेतला.हे ऐकून मीडियातील काहींना आनंद झाला.आनंद व्हायला हरकत नाही,पण हीच भूमिका शिवसेनेने मांडली होती तेंव्हा "शिवसेनेची गुंडागर्दी" या मथळ्याखाली वार्तांकन करण्यात आणि चर्चांची गुऱ्हाळं करण्यात याच झी समूहाचे चॅनेल्स आघाडीवर होते ना? त्यांनीच तेंव्हा पाक कलाकारांच्या किंवा पाकड्यांच्या बाजूने अश्रू ढाळले ना? हि कसली पत्रकारिता? जो देश आपल्या देशाच्या मुळावर उठला आहे त्या देशाच्या कलाकारांना आम्ही आपल्या भूमीत कला सादर करून देणार नाही म्हणजे नाहीच.इथे कोणत्याही पाकड्यांना थारा नाही.खेळाडूंना नाही,कलाकारांना नाही आणि लेखकांनाही नाही.अजिबात खपवून घेतलं जाणार नाही.हीच शिवसेनेची भूमिका होती आहे आणि असेल.तुम्हाला आज शहाणपण सुचलं असल तरी ते टिकणार असेल तर स्वागतच आहे.सर्वांनीच पाकड्यांवर बहिष्कार टाकावा.शिवसेना त्याच स्वागतच करेल.त्यांनी आपल्या जवानांवर पाठीमागून भ्याड हल्ले करायचे,आपल्या जवानांनी ते झेलायचे आणि देशासाठी बलिदान द्यायचं आणि तुम्ही इकडे पाकड्या कलाकारांसाठी आणि खेळाडूंसाठी टाळ्या वाजवायच्या हा शहिदांचा अपमान आहे.शहिदांना श्रद्धांजली वाहायचीच असेल तर बदला घ्या,बदला घ्या,बदला घ्या..!

मोदींचे समर्थक आजकाल आम्हाला समजावतात "इथे बसून बोलणं सोपं आहे,मोदींना विरोध करणं सोपं आहे,पंतप्रधान झाल्यावर कळतं नेमकं काय असत ते" वगैरे.अहो,हे आम्हाला काय सांगता? तुम्ही अडीच वर्षांपूर्वी काय करत होतात? विरोधच ना? बरं,पाकवर हल्ला करा असं म्हणण हा मोदीविरोध कसा? उलट आमचा अजून तरी मोदींवर विश्वास आहे म्हणून सांगतोय.आता कोणतंही कारण सांगू मका.जनतेने मोठ्या विश्वासानं तुम्हाला प्रचंड बहुमतासह सत्ता दिली आहे.पाकला धडा शिकवाच..!

जय महाराष्ट्र..!

Saturday, 17 September 2016



"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

दिव्यांगांचा दिव्यपराक्रम..!

हम भी कुछ कम नही..!

ब्राझील देशात नुकतीचच खेळांचा महाकुंभ म्हणून नावजलेली आणि अत्यंत प्रतिष्ठेची अशी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली.त्यात हिंदुस्थानी पथकाला केवळ दोनच पदके मिळाली.ऑलिम्पिक स्पर्धेत जाऊन पदक पटकावण आणि तिरंगा फडकावण सोपं नसलं तरी अशक्य नक्कीच नाही.याच ऑलिम्पिक स्पर्धेची सांगता झाल्यानंतर अल्पावधीतच दिव्यांग खेळाडूंसाठी भरणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानी पथकाने अत्यंत चमकदार कामगिरी केलेली पाहायला मिळाली.त्यांच्या या कामगिरीच्या बळावर आजपर्यंत हिंदुस्थानला पॅरालिम्पिक – २०१६ स्पर्धेत चार पदकं मिळाली आहेत.दिव्यांगांचा हा दिव्यपराक्रम निश्चितच कौतुकास्पद,अभिमानास्पद आहे.हिंदुस्थानच्या दिव्यांग खेळाडूंनी यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन सुवर्ण,एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावत “हम भी कुछ कम नही” हे दाखवून दिलेलं आहे.

काही दुर्दैवी अपघातांमुळे किंवा जन्मतःच वाट्याला आलेल्या शारीरिक व्यंगावर मात करत,त्यामुळे होणाऱ्या टिंगलटवाळीवर मत करत पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंगा डौलान फडकवण्याची कामगिरी हिंदुस्थानी दिव्यांग खेळाडूंनी केली आहे.त्यासाठी प्रचंड मेहेनत,जिद्द आणि लढवय्या बाणा दाखवण अत्यंत महत्वाच ठरत.हिंदुस्थानी दिव्यांगांची ही नेत्रदीपक,दिग्विजयी कामगिरी प्रत्येकालाच आयुष्य कस जगावं आणि आयुष्यात कसं लढाव आणि जिंकावं हे दाखवून देणारी आहे.आजकाल अनेक धडधाकट,तरुण-तरुणी हे अगदी लांच्छनास्पद जीवन जगतात.ज्या वयात कष्ट करायचे,घाम गाळायचा त्या वयात आजकाल असे लोक लोकल ट्रेन,रेल्वे किंवा मंदिराबाहेर भिक मागताना दिसतात.काहींवर अत्यंत दुर्दैवी परिस्थितीमुळे ती वेळ आलेली असते,मात्र आजकाल भिक मागण हा सुद्धा एक धंदा बनला आहे.हे कसलं जीवन?

ज्यांच्याकडे धडधाकट शरीर आहे त्यांनी घाम गाळायला,कष्ट करायला काय हरकत आहे? मुळात अशा वेळी मिळेल ते काम करण्याची तयारी असावी लागते.आज कष्टात काढलेल्या दिवसांमुळेच उद्याचे सोन्याचे दिवस येत असतात.अनेकदा अगदी उच्चशिक्षित तरुण-तरुणींना “तुम्ही काय करता?” हा प्रश्न विचारल्यावर मिळणारं उत्तर फारच दुर्दैवी असतं.ते उत्तर असतं “इंजिनियरींग झालय,नोकरी मिळत नाहीये त्यामुळे सध्या निवांत आहे.” असं निवांत राहून कसं चालेल हो? बर,त्यापुढचा भाग तर आणखी चक्रावून टाकणारा असतो.त्यांना पुढचा प्रश्न विचारायचा “पुढे काय करणार मग?”.उत्तर मिळत “माहिती नाही,काय करावं तेच कळत नाही”.आता एवढ शिकून आणि मोठ होऊन पुढे काय आणि कस करायचं कळत नसेल तरं एवढ शिकून उपयोग काय? त्याचा उपयोग कधी करणार? नुसतं कोणत्या तरी कंपनीच्या जॉबची ऑफर घेऊन तो जॉब करण म्हणजे जीवन आहे का? बर,एक-दोन कंपन्यांनी जॉब नाकारला तर निराश होऊन घरी बसणारे वेगळेच.त्यांच एकच चालू होत “आपलं काही होऊ शकत नाही.”तुम्ही घरी बसणार तर तुमच काही कसं होणार?

हिंदुस्थानात बेरोजगार युवावर्ग प्रचंड मोठा आहे.या युवावर्गातून अनेकदा थेट हिंदुस्थानलाच जबाबदार धरत बेरोजगारीच खापर देशावर फोडल जातं.“हिंदुस्थानात असच होत राहणार.जॉब नाहीत,हिंदुस्थानात आम्हाला भविष्य नाही.” असा नाराजीचा सूर आळवत आजकाल बेरोजगार आयुष्य जगत असतात.नव्हे,आयुष्य एक-एक दिवसाने पुढे ढकलत असतात.जीवनांत करण्यासारख किती काही असतं.ते विसरून फक्त “जॉब करण म्हणजे जीवन” अस समजून आजकाल बेरोजगारांची वाटचाल सुरु असते.विशेषतः मराठी बेरोजगारांनी तर स्वतःचा उद्योग सुरु करण्याचा निदान प्रयत्न केल्याचीही उदाहरणे अत्यल्प आहेत.सगळ्यांना जॉब पाहिजेत.जॉब कुठून येणार? जॉब कंपन्या देतात.तुम्हाला कंपनी जॉब देत नाही तर तुम्ही एखादी कंपनी काढा आणि इतरांना जॉब द्या.त्यासाठी धाडस जरूर लागत.आधी छोटी कंपनी सुरु करायची आणि तोटा झाला तरी तो सहन करायचा.जिद्दीने आणि मेहेनतीने ती मोठी करायची.यात सर्वात महत्वाची गोष्ट असते ती संयम.संयम नसला तर उद्योग करणच अवघड आहे.उद्योग क्षेत्रात काहीच झटपट होत नसत.त्यासाठी झाडाचं उदाहरण घेता येईल.औदुंबर,वड,पिंपळ,आंबा कोणतही झाड असो,ती आधी “बी”च असते ना? मग त्याच रोपट होत.अनेक वर्षे उन,वारा,पाऊस सहन केल्यानंतर मग त्याचा मोठा वृक्ष होतो.तसचं उद्योगाचं आहे.“आपल काही होऊ शकत नाही” असं म्हणत घरी बसलात तर काहीच होणार नाही.

हिंदुस्थानी पॅरालिम्पिकवीरांची कामगिरी ही इतर दिव्यांगांनाही प्रेरणादायी आहे.दिव्यांग आहोत म्हणून निराश होण्यापेक्षा आणि आयुष्यभर रडत जीवन जगण्यापेक्षा जिद्द आणि मेहेनेतीच्या बळावर जग जिंकून दाखवलं तर तुमचं आयुष्यही सोनेरी होऊ शकत.जन्मतःच दिव्यांगत्व असण हा आपला दोष नसतो.त्यावर मात करता यायला हवी.दिव्यांगत्व हे अपघातात एखादा अवयव निकामी झाल्याने येऊ शकत,पण तस झालं म्हणजे सगळ संपल अस नाही.दिव्यांगत्व येण हे बहुतांश वेळा आपल्या हातात नसतच.ते दुर्दैवानेच येत असतं.आजपर्यंत धडधाकट आणि सुदृढ असलेल्या व्यक्तीलाही उद्या अपघात झाल्यास दिव्यांगत्व येऊ शकत.दिव्यांगत्व येण हे दुर्दैवी असलं तरीही तो काही शाप नाही.जीवनात कधीच हर मानायची नसते.जिद्दीने,प्रामाणिकपणे मेहेनत केल्यास एक न एक दिवस यश मिळतच.

दिव्यांग आणि इतरांमध्ये काय फरक असतो? दिव्यांगांना एखादा अवयव कमी शारीरिक क्षमतेचा असतो अथवा निकामी झालेला असतो किंवा शरीरापासून वेगळा आलेला असतो.असं असल तरी काहीतरी करून दाखवायची इच्छा आणि तयारी असेल,जिद्द आणि मेहेनत करण्याची तयारी असेल तर दिव्यांग व्यक्तीही सामन्यांच्या बरोबरीने किंवा त्यापुढे जाऊनही यशाची शिखरे गाठू शकतात.उदाहरण घ्यायचे झाल्यास रिओ ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला मिळालेल्या पदकांची संख्या ही दिव्यांग खेळाडूंनी रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत आजपर्यंत मिळवलेल्या पदकांच्या संख्येच्या निम्मी आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढत यश मिळवण्याची जिद्द असेल तर यश तुमचच आहे हेच सिद्ध होत.



जय महाराष्ट्र..!

Saturday, 10 September 2016



"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

विलास शिंदेंच हौतात्म्य..!

त्यांच्या खांडोळ्या करा..!

मुंबईत धर्मांध गुंडाच्या भ्याड हल्ल्यात जबर जखमी झालेल्या वाहतूक पोलीस दलातील विलास शिंदेंची मृत्यूशी सुरु असलेली झुंज तब्बल आठ दिवस चालूच होती.आपल कर्तव्य बजावत असताना धर्मांध मवाली आणि गुंड प्रवृत्तीला भिक न घालता विलास शिंदे यांनी हौतात्म्य पत्करलं.कर्तव्यनिष्ठा न सोडता मागून केलेला भ्याड वार झेलत पत्करलेलं विलास शिंदे याचं हौतात्म्य जगाला खूप काही शिकवून जात.अशा या जिगरबाज आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास आम्ही सलाम करतो.अशाच कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमुळे आज आपण आपापल्या घरात,शहरात आणि राज्यात सुरक्षित आहोत.महाराष्ट्र पोलिसांवर नेहमीच प्रचंड टीकाही होत असते,मात्र हैदोस घालणाऱ्या धर्मांध मवाल्यांना न जुमानता,त्यांची गुंडगिरी मोडून काढत प्राण गेले तरी कर्तव्यात कसूर न पडू देणारे विलास शिंदे आणि इतरही जिगरबाज पोलीस अधिकारी आजही आपल्या महाराष्ट्र पोलीस दलात आहेत आणि राज्यात जेवढी शांतता आणि सुव्यवस्था आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांच्यामुळेच आहे हे विसरुन चालणार नाही.   

महाराष्ट्रात पोलिसांवर हल्ला होण्याची ही काही पहिली वेळ नाही.यापूर्वीही अनेकदा असे प्रकार झालेले आहेत.मुंबईत निघालेल्या रझा अकादमीच्या मोर्चातही पोलिसांना मारहाण केली गेली होती.इतकच नव्हे तर शहीद जवान स्मारकाला लाथाडण्याची मस्ती आणि उद्दामपणा धर्मांधांनी दाखवून दिलेला होता.अशा घटनांमुळे चक्क पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.जे पोलीस सर्वांना सुरक्षित ठेवतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित व्हावा अशी परिस्थिती का निर्माण झाली? कायदे मोडणाऱ्यांना आणि शांतता भंग करणाऱ्यांना “पोलिसी खाक्या” दाखवून वठणीवर आणणे हे पोलिसांचं काम आहे,मात्र सध्या अनेकदा पोलिसांनाच धर्मांधांचा आणि गुंडांचा मार खावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते.याचा अर्थ काय घ्यायचा? ज्या राज्यात पोलिसच सुरक्षित नाहीत त्या राज्यातील सामान्य जनता सुरक्षित आहेत असं कसं म्हणता येईल?

पोलीस हे समाजात शांतता-कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी घरदार सोडून आणि सण-वार,वेळ-काळ न पाहता अहोरात्र झटत असतात.धर्मांधांना,गुंडांना आणि मवाल्यांना कायद्याचा धाक दाखवून सरळ करण हे पोलिसांचं काम आहे.त्यासाठी कायदेही आहेत.सर्वांनी कायद्यानुसार चालावं आणि कायद्याचा भंग होऊ नये याची खबरदारी पोलिसच घेत असतात.त्यामुळे पोलिसांना “कायद्याचे रक्षक” असं म्हटल जातं.असं असलं तरी अनेकवेळा या कायद्यांमुळेच पोलिसांचा घात होतोय.आपल्या पोलिसांकडे पुरेशी शस्त्रे नाहीत.असतील तर अत्याधुनिक नाहीत.स्वतःच्या बचावासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सुविधा नाहीत.मुळात हे सगळ असलं—नसल तरी कुठे फरक पडतोय? आपले जिगरबाज पोलीस जीवाची पर्वा न करता लढायला आणि प्रसंगी शहीद व्हायलाही तयार आहेत,मात्र त्यांना लढायचा आदेशच दिला जात नाही.आदेश मिळाल्याशिवाय काही केलं तर पोलिसांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो.आदेश मिळणं आणि त्यानुसार कारवाई होण हा कायद्याचा भाग असला तरी आदेश मिळेपर्यंत पोलिसांनी मार खावा असा याचा अर्थ नाही.समोरच्याने पोलिसांवर हात टाकायचा प्रयत्न केला तरी तो हात जागीच धडावेगळा करण्याचा अधिकार पोलिसांना हवा.तरच अशा धर्मांध आणि गुंडावर कायद्याचा वचक बसेल आणि तरच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील आणि राज्यात शांतता नांदेल.

महाराष्ट्र पोलीस असोत किंवा हिंदुस्थानी जवान असोत,सगळेच महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी बलिदान द्यायला तयार आहेत.आपल्या मातीसाठी लढायला आणि प्रसंगी मरण पत्करायला हे पोलीस आणि जवान कदापि मागेपुढे पाहणार नाहीत, मात्र काही कारण नसताना अशा वीरांच रक्त का सांडलं जावं? फडतूस मवाल्यांच्या हल्ल्यात या जिगरबाज पोलिसांनी आपले प्राण का गमावावेत? हे थांबलंच पाहिजे.पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शासन झालचं पाहिजे.पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना पकडा आणि त्यांच्या खांडोळ्या करा.त्यांच्या शरीराचे तुकडे कोल्हया-लांडग्यांना खायला टाका.ही शिक्षा फक्त दोन-चार वेळा अंमलात आणून बघा.पोलिसांवर हात टाकायची आणि कायदे मोडायची हिंमत कोणीही कधीही करणार नाही.नुसते न्यायालयात खटले टाकल्याने आणि कोठडीत डांबल्याने यांची मस्ती उतरणार नाही.त्यांना मृत्युदंडच हवा.


जय महाराष्ट्र..!    

Saturday, 3 September 2016



"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

देवाच्या दरबारात सगळे सारखेच..!

आता घुबडालाही प्रतिष्ठा मिळेल..!

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि जगप्रसिद्ध उत्सवांपैकी एक असलेया गणेशोत्सवाला आता केवळ एक दिवस बाकी आहे.सर्वत्र गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी चालू आहे.मुंबईतील जगप्रसिद्ध आणि भव्य गणेशमूर्ती मंडपात आणल्या जात आहेत.नुकताच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या गणरायाच्या मूर्तीच गणेशभक्तांना पहील दर्शन मिळाल.प्रतिवर्षी मूर्तीच्या मूळ रुपात फारसे बदल न करता थोडी विविधता साधत या गणरायाची मूर्ती तयार केली जाते.याही वर्षी अशीच देखण्या आणि प्रसन्न रूपातील गणराज भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अवतरले आहेत.लालबागच्या राजाच्या यंदाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गणराय जरी नेहमीच्याच रुपात असले तरी त्याच्या सिंहासनाची प्रभावळ हि घुबडाच्या रुपात तयार केलेली आहे.

घुबड हा पक्षी देव-धर्माच्या बाबतीत नेहमीच वाईट मानला गेलेला आहे.घुबडाला कोणतेही शास्त्रीय कारण नसताना अपशकुनी ठरवण्यात आले आहे.वास्तविक पाहता घुबडाबद्दल हिंदू धर्मात कोणताही वाईट असा उल्लेख नाही किंवा घुबडामुळे अपशकून झाल्याची उदाहरणेही नाहीत.पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीवच नव्हे तर हे विश्वच देवाने निर्माण केल आहे अस आपण मानतो.पृथ्वीतलावरील सर्व प्राणी,पक्षी आदी जीवांची निर्मिती देवानेच केली आहे.तरीही मानवाने काही कारण नसताना घुबड,टिटवी अशा पक्षांना आणि मांजरीसारख्या प्राण्यांना अपशकुनी ठरवल आहे.अनेक घरात तर घुबड आणि टिटवी हे शब्दही उच्चारणे अपवित्र मानले जाते.त्याचप्रमाणे वटवाघुळाचेही आहे.या जीवांचे नुसते दिसणेही माणसाला नको असते.मांजर आडवं गेल्याने म्हणे काम होत नाहीत.एखाद्याच काम पूर्ण होण अथवा व्यवस्थित होण हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.त्यात मांजरीचा काय दोष? तुम्हाला अपशकून होईल म्हणून मांजरींनी फिरणं सोडावं काय? आणि तसे झाल्यास त्यांना अन्न कसे मिळणार? अन्नाच्या शोधात एखादा प्राणी हिंडत असताना तो तुम्हाला आडवा गेला,आणि म्हणून तुमचं काम झाल नाही हे कसलं संशोधन?

टिटवी हा पक्षी ओरडल्यावर म्हणे वाईट घटना घडते अथवा वाईट बातमी मिळते.आता हा माणसाच्या मनाचा कारभार त्या टिटवीला कसा कळणार? आणि कळलंच तर टिटवीने आजन्म तोंड बंद ठेवावं का? देवाने प्रत्येकाला वेगळा आवाज दिला आहे.त्याचा वापर करून सगळे जीव संवाद साधत असतात.त्यामुळे टिटवी ओरडल्याने अपशकून होतो अस कस म्हणता येईल? न ओरडता टिटवीच्या पिलांनी आईकडे अन्न कस मागायचं? काहीही आधार नसताना प्राण्यांना किंवा पक्षांना अपशकुनी कस ठरवता येऊ शकत? आजच्या युगात खरतर पशु-पक्षी नाही तर माणसच माणसांना अपशकून ठरत आहेत.अस असताना आपल्या कर्माचा दोष पशु-पक्षांना कसा देता येईल? अंधश्रद्धा निर्मूलन करत असताना अशाही गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.त्यामुळे समाजातील गैरसमज दूर होतील आणि हिंदू धर्म अधिक बळकट होईल.धर्मातील प्रथा-परंपरांना आधार असेल तर त्या प्रथा आणि परंपरा नसून अंधश्रद्धा असतात.

देवाच्या दरबारात सगळे सारखेच अस म्हटल जात.राजाच्या दरबारी सगळ्यांना न्याय मिळतो असही म्हणतात.लालबागच्या राजाने हेच करून दाखवलं.लालबागच्या राजाच्या सिंहासनाची प्रभावळ घुबडाच्या आकारात साकारत मंडळाने एक नवा आदर्श घालून दिलेला आहे.आता घुबडालाही प्रतिष्ठा मिळेल.एकीकडे पशु-पक्षांवर दया दाखवा,त्यांना चारा पाणी ठेवा अस सांगायचं आणि एखाद्या मुक्या जीवाला अपशकुनी ठरवायचं हे योग्य नाही.अशा अंधश्रद्धा वेळीच नष्ट करायला हव्यात.त्यासाठी सर्वांना गणराया बुद्धी देईल आणि हिंदू धर्मातील काही आधार नसलेल्या सर्व अनिष्ट प्रथा-परंपरा नष्ट होतील व हिंदू धर्म अधिकाधिक बळकट होत राहील एवढीच प्रार्थना.

जय महाराष्ट्र..!